संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
‘१५ ऑगस्ट’ हा दिवस देशभर ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो व ह्या दिवशी सर्व भारतीय जनमाणसात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असतो, मात्र या दिवशी देशाच्या दुश्मनांकडून काही घातपाताच्या घटनांचा धोका देखील असतो. या पार्श्वभूमीवर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये चोख बंदोबस्त करण्यात येतो. या स्वातंत्र्य दिनी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताही घातपात घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी ‘मिशन ऑलआउट’ काल रात्री पासून सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत नाकाबंदी करण्यात आली आहे. छोट्या रस्त्यांवर पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीतून आत येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. मुंबईचे महत्त्वाचे प्रवेश द्वार असलेल्या आनंद नगर टोल नाक्यावर मुंबई पोलिसांची मोठी नाकाबंदी लावण्यात आली आहे. प्रत्येक वाहन चालकांची चौकशी करून, कागदपत्रं तपासली जात आहेत.
मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी एस चैतन्य यांनी सांगितलं की, या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांची सुरक्षा वाढवली आहे. खासकरुन मंत्रालयात जिथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे तिथली सुरक्षा कडक करण्यात आली आहे. डीसीपी चैतन्य यांनी सांगितलं की, कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ज्या व्यक्तिवर संशय आहे त्या सर्व व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. ‘बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड’ सोबत सर्व महत्वाच्या परिसरांची काटेकोरपणे पाहणी केली जात आहे. मुंबईच्या ९४ पोलीस स्टेशन्सच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांनी हाय अलर्ट वर राहावं. त्यांच्या परिसरात त्यांनी पेट्रोलिंग करावी. सोबतच ‘एंटी टेरर सेल’ (एटीसी) आणि बीट ऑफिसर यांना देखील माहिती काढण्यासाठी सांगितलं आहे.