संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक २० हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही? यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होत चालला आहे. त्यातच राज्याचे शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे खरच ढकलण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या ?
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “राज्यमंत्र्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतोय. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ. पुरवणी परीक्षा असते, त्यांना परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतं. त्यानंतर अॅडमिशन होतं. बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात. त्यामुळे विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही बोर्ड, एसइआरटीशी चर्चा करत आहोत. विचार करून निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर पुढेच निर्णय अवलंबून आहेत.”
काय म्हणाले होते बच्चू कडू ?
दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याच्या सूचना बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. बच्चू कडू यांनी केलेल्या या सूचनांवर आता शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पहावं लागेल.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक
इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.