संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्रातील सत्तेत नुकताच मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळाला. शिवसेनेमध्ये आमदारांनी बंडखोरी केली. परिणामी, आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकासवआघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. मात्र, आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार देखील बंड करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या खासदारांनी बंड करू नये यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. मात्र, आता काँग्रेससह राष्ट्रवादीनेही उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता जवळ आली असून या पदासाठी द्रोपदी मुर्मू या एनडीएच्या उमेदवार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केल्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र समोर आलं आहे. शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, सर्व खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. अखेरीस खासदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला असल्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीने यावर नाराज व्यक्त केली आहे. भाजपच्या उमेदवारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँगेस पक्षात देखील नाराजीचा सूर आहे. यूपीएच्या यशवंत सिन्हा यांना सेनेने पाठिंबा न दिल्याने महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.