_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिवा-पनवेल मार्गावरील दातिवली आणि निळजे रेल्वे स्थानकादरम्यान संदप गावातील केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांतील अंतर्गत कलह कारणीभूत असून यात भाजपच्या कार्यकर्त्याला नाहक गोवण्याचा प्रयत्न होत असून भाजपला बदनाम करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. डोंबिवली भाजपा ग्रामीण चे अध्यक्ष नंदू परब, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, माजी नगरसेविका रवीना माळी, अमर माळी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
डोंबिवली जवळील संदप गावातील केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांनी १० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी प्रल्हाद पाटील यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सदर आत्महत्या ही भोपर गाव येथील राहणारे संदीप माळी मारहाण आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला होता तसेच काही लोकांची नाव जाहीर करत आत्महत्या केली होती. याबाबतची तक्रार मयत प्रल्हाद पाटील यांचे मोठे बंधू चंद्रकांत नारायण पाटील यांनी ठाणे रेल्वे पोलीसांकडे केली असून ठाणे जीआरपीमध्ये गुन्हा दाखल झाला होता._
भोपर आणि परिसरात संदीप माळी, रवीना माळी, अमर माळी यांनी मूलभूत सुविधा, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवली आहे. भाजपचे संघटन विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करीत असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात दुखु लागले आहे म्हणूनच राष्टवादीचे प्रवक्ते महेश तपासे हे आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे केबल व्यवसायिकाच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकले आहेत.
भाजपचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर
यावरून भाजपाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्ष संपत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पक्षावर लक्ष नाही दिलं तर जे दोन पाच लोक निवडून येतात ते देखील येणार नाहीत असा टोला कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांसमोर लगावलाय. केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील याच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून आरोप करण्यात आलाय. त्यामुळे पक्षनिष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे भाजपा ठामपणे उभा राहिल. या प्रकरणाबाबत ठाणे रेल्वे पोलीस तपास करीत असून, त्यांनी निःपक्षपातीपणे तपास करावा असे शशिकांत कांबळे यावेळी बोलताना म्हणाले तसेच यापुढे बोलताना भान ठेवून बोला, असा इशाराही देत केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.
व्यावसायिकाने मानसिक त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या
सदर आत्महत्या ही झालेल्या मानसिक त्रासातून आणि अंतर्गत कौटुंबिक कलहातून झाली आहे. संदीप माळी यांच्या वर या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे आरोप नसल्याचे पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांनी सांगितले. तर केबल व्यावसायिकांच्या बैठकीत कोणताही वाद नव्हता. सर्व काही बोलणी सामंजस्याने झाली होती. असे भाजपा ग्रामीण अध्यक्ष नंदू परब म्हणाले. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकले आहे आहेत व या प्रकरणाचा तपास पुढे नेमका कोणत्या दिशेला जातो ते आता पहावं लागेल.