Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही – संजय राऊत

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

उत्तर प्रदेशात शिवसेना स्वबळावर लढणार..

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण उचलून धरलं आहे. या प्रकरणावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. पण देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकारकडे वेळ नसेल, तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर आरोप केले. मोदी सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही, हे तुम्हाला सरकार सत्तेत आल्यापासून जाणवत असेल. संसद चालवणं सरकारची जबाबदारी असते, पण त्यांची ही इच्छा दिसत नाही. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे. चर्चेवेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उपस्थित राहावं, त्यानंतर न्यायालयीन चौकशी नेमायची किंवा जेपीसी नेमायची का हा नंतरचा विषय आहे, असं राऊत म्हणाले.

पेगासस हेरगिरी हा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ते ऐकलं पाहिजे. सरकार त्यापासून का पळ काढत आहे ? इतक्या गंभीर विषयावर देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेला तीन तास देऊ शकत नाही का? आम्ही त्यांचे फक्त तीन तास मागत आहोत तेही देशासाठी. आणि सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, अशी टीका राऊत यांनी यावेळी बोलताना केली.

अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक संसद योग्यरित्या चालू देत नसल्याचा आरोप सरकारकडून होताना दिसत आहे. पण, संजय राऊत यांनी यासाठी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. सरकार विरोधी पक्षांवर ठपका ठेवत हे, मुळात सरकारलाच संसद चालू द्यायची नाही. सरकारला पेगाससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. पेगासस असेल, कृषी कायदे असेल, विरोध पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचं ऐकणं लोकशाहीत प्रत्येक सरकारला बंधनकारक जरी असलं तरी केंद्रातलं सरकार त्या संदर्भात सतत माघार घेताना दिसतंय. विरोधकांना गोंधळ घालण्यास सरकारच प्रवृत्त करतंय, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

उत्तर प्रदेशात शिवसेना स्वबळावर लढणार..

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि राजदने आघाडी केली आहे. पण, या आघाडीपासून शिवसेनेनं दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवरही बोलले. सपा, राष्ट्रवादी, राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा ? .. असा सवालच त्यांनी बोलताना उपस्थित केला. तसेच, शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय, असंही ते म्हणाले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *