Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रेल्वे प्रवाश्यांना एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के घट – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वे प्रवाश्यांना यंदाच्या उकाड्यात गारेगार प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एसी लोकल रेल्वे मुंबई सीएसटीएम ते कसारा, कर्जत आणि चर्चगेट ते डहाणू व पनवेल या मार्गावर सुरु करण्यात आली. त्यातच या एसी गाड्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात असल्याने या गाड्याने प्रवास करण्याचे रेल्वे प्रवाश्यांकडून टाळले जात होते. तसेच या लोकलचे तिकिट दरही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे एसी लोकलच्या गाड्या अनेकदा विना प्रवाशीच धावत असल्याचे चित्र पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर एसी लोकल गाड्यांच्या प्रवासी तिकिट दरात थेट ५० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जाहीर केला.

पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व रेल्वे मार्गावर मिळून जवळपास ९० लाखापर्यंत लोक हे दररोज लोकलने प्रवास करतात. सीएसएमटी ते पनवेल-कसारा-कर्जत असा मध्य रेल्वेचा पसारा असून चर्चगेट ते डहाणू असा पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेचा पसारा आहे. या दोन्ही मार्गावर एकुण २९०० लोकलच्या फेऱ्या दररोज होत असतात.

असं असतांना या मार्गांवर विविध ठिकाणी एसी लोकल (वातानुकूलित लोकल) च्या अत्यंत मर्यादीत फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र या एसी लोकलचे तिकीटाचे आणि दैनंदिन पासचे दर हे अव्वाच्या सव्वा असून सर्वसामान्यांच्या बजेटच्या पलीकडे असल्याने या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यातच काही एसी लोकलच्या फेऱ्या या ऐन गर्दीच्या वेळी सुरु केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कारण एक लोकल कमी करत ही एसी लोकल आल्याने, यामधून फार कमी प्रवासी प्रवास करत असल्याने या लोकलच्या मागे-पुढे असलेल्या लोकलमधील गर्दी वाढलेली बघायला मिळाली. त्यामुळे या एसी लोकल बंद करण्याची मागणी प्रवाशांकडून व्हायला लागली होती.

आज भायखळा इथे झालेल्या रेल्वेच्या एका कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी करत असल्याचे जाहीर केले. यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागाचे ते आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चेगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे ते आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत.

असे असतील सुधारीत दर

किमी         सध्याचे दर      सुधारीत दर
 ०५                  ६५                  ३०
 २५                १३५                  ६५
 ५०                २०५                 १००
१००                २९०                 १४५
१३०                ३७०                १८५

असं असंल तरी रेल्वे राज्यमंत्री यांनी तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी केले आहेत, याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र स्पष्ट केलेले नाही. मात्र कार्यक्रमानंतर प्रसिद्धी व प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, आज मी घोषणा केली आहे. लवकरच दिल्लीला जाणार असून त्यानंतर यासंदर्भातील नोटीफिकेशन काढण्यात येईल. नोटीफिकेशन काढलेल्या दिवसापासून मग ५० टक्के म्हणजेच अर्ध्या तिकिट दरात एसी लोकलने प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *