Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

दोन्ही पक्षाचे आमदार श्रेय लाटण्यासाठी काहीही करू शकतात; शिवसेनेचा मनसे-भाजप वर हल्लाबोल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना सतत पाठपुरावा करून विकासकामे पूर्ण करते, सुज्ञ नागरिक त्या कामांचे श्रेय आपोआपच देतात..

शिवसेनेने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे व भाजपाच्या कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याचा प्रवृत्तीवर हल्लाबोल केला. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्याच्या मंजूर निधीवरून शिवसेनेने कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर सडकून टिका केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली किती तरी विकासकामे जनता पहात असून आमदार राजू पाटील यांनी आपले किमान एकतरी केलेले विकासकाम दाखवण्याचे जाहीर आव्हानही शिवसेनेने दिले आहे.

कल्याण-शिळ रस्त्याच्या पाहणीदरम्यान आमदार राजू पाटील यांनी आपण मंजूर केलेल्या रस्त्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेकडून आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करण्यासह आमदार राजू पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकी आधी भाजपा चे तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठा गाजावाजा करत निधी मंजूर नसतानाच शहरभर रस्त्यांच्या काँक्रीटीकरण सारख्या कामाचे नारळ फोडले व नागरिकांची दिशाभूल केली. त्यामुळे या दोन्ही आमदारांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही सेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमूख प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले की खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांसाठी ३६० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला आणि काही लोकांचा पोटशूळ उठला. त्यापैकी तब्बल १११ कोटी निधी हा कल्याण ग्रामीणमधील रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे.

त्याआधी डोंबिवली एमआयडीसीसाठी ११० कोटी, डोंबिवली शहरासाठी ५ कोटी तर ‘पीडब्ल्यूडी’ कडून मानपाडा रोडसाठी २७ कोटी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून आणले आहेत.लवकरच या कामांना सुरुवात होईल.आज जरी या रस्त्यांची परिस्थिती बिकट असली तरी संपूर्ण वर्षभरात कायापालट होणार असल्याचा विश्वास प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केला. तर शिवसेना आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे श्रेयासाठी काम करत नाही. काम केल्यावर जनता आपोआप त्याचे श्रेय त्यांना देते. त्यासाठी खासदारांना धडपड करायची आवश्यकता नाही असेही ठामपणे सांगितले.

विकासकामे तडीस नेण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते, संबंधित शासकीय विभागाकडे पाठपुरावा करावा लागतो. केवळ पत्र देऊन कामे होत नसल्याचा टोलाही म्हात्रे यांनी लगावला. तर मानपाडा रोडसाठी ‘पीडब्ल्यूडी’ ने मंजूर केलेला २७ कोटींचा निधी केवळ आपल्या एकट्यामूळे आल्याचा आमदार राजू पाटील यांचा दावा खोटा असल्याचे सांगत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचाही त्यामध्ये मोठा पाठपुरावा असल्याचे यावेळी सांगत संबंधित पत्रात दोघांची नावे असताना पाटील यांनी फक्त स्वतःचे नाव दाखवून श्रेय लाटण्याचा चुकीचा प्रयत्न केल्याचे प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.

शिवसेनेचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आणि माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सांगितले की कल्याण ग्रामीण मतदारसंघ शापित असल्याची चर्चा लोकं करतात. या मतदारसंघाला सद्या निष्क्रिय आमदार लाभल्याची टिका त्यांनी केली. तसेच राजू पाटील यांच्या पत्रामूळे नाही तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या एवढी दूरदृष्टी असणारा लोकप्रतिनिधी आपण आजपर्यंत बघितला नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी काय काम केले आहे ते सांगावे असा प्रश्न उपस्थित केला. तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थायी समितीत मंजुरीसाठी आलेले ३३ कोटींचे रस्त्याचे काम सुनील जोशी यांच्या करवी थांबवले.असाही आरोप केला .

या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, युवासेना कल्याण जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे, कल्याण तालुका प्रमूख प्रकाश म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्यासह योगेश म्हात्रे, राजेश कदम आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *