मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र निसार तांबोळी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
निसार तांबोळी हे 1996 पासून पोलीस सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत.
हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, अमरावती, नाशिक, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. 2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते, 2008 ते 2009 एअरपोर्ट झोन, 2015 ते 2017 औरंगाबाद येथे SRPF येथे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.
त्यांना यापूर्वी SRPF औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या निसार तांबोळी यांना भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना फार आवडते, स्वच्छ कारभार हा त्यांचा अजेंडा असून आपल्या प्रतिमेला आजपर्यंत कसलाही डाग त्यांनी लागू दिलेला नाही.
स्वच्छ प्रतिमेचे एक तरुण तडफदार पोलीस अधिकारी म्हणून त्यांची चांगली ओळख जनमानसात आहे, मुंबई क्राईम ब्रँचसाठी दुसऱ्यांदा प्रशासनाने त्यांना पाचारण केले आहे, शासन जिथे पाठवेल तिथे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. लातूरचे भूमिपुत्र असलेले प्रामाणिक पोलीस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.