Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भाजपसाठी धोक्याची घंटा, मीच उमेदवार आहे समजून मतं द्या असं आवाहन करूनही हिंदी पट्ट्यातील मतदार मोदींना नाकारतोय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजपसाठी गुजरातचा विजय आणि हिमाचल प्रदेश तसेच दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत बसलेला धक्का ही नवी भविष्यातील आव्हानांचीही चिन्हं आहेत. याचा परिणाम येत्या वर्षभरात नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर तर होईलच, शिवाय लोकसभा निवडणुकीपर्यंतही त्याचा परिणाम होणार आहे. विशेषत: भविष्यातील सामाजिक-राजकीय रणनीतीवरही याचा परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गुजरातमध्ये जादू कायम असल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे. मात्र इतर राज्यांमध्ये म्हणजे दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत.

हिंदी पट्ट्यातील भाजपचा पराभव

योग्य सुसंवाद आणि नेत्यांची अनुपस्थिती, धोरण आणि हेतू यांचे निकाल कसे लागतात, हे निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनांचा परिणाम केवळ गुजरात मध्ये मर्यादित राहतो, तर दुसऱ्या राज्यांमध्ये त्याचा पूर्ण अभाव आणि परिणाम जाणवतो हे इतर राज्यांमधील निकालांवरून स्पष्ट होतंय. गुजरातमध्ये सातव्यांदा निवडणूक जिंकून भाजपने इतिहास रचला असला, परंतु हिमाचलमधील तीन दशकांची प्रथा बदलण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आले आहे.

गुजरातमध्ये २७ वर्षे उलटल्यानंतरही भाजपने ऍन्टी इन्कम्बन्सीला वर्चस्व दिसले मात्र दुसरीकडे, हिमाचल प्रदेशमध्ये ती अवघ्या पाच वर्षांत भाजप आणि मोदी ब्रँड ऍन्टी इन्कम्बन्सीची शिकार ठरत आहे. दिल्ली महानगरपालिकेतील सत्ता जाणं हा देखील त्याचाच भाग आहे. विशेष म्हणजे लवकरच मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकात निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या राज्यांमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड यश मिळालं आहे. विशेष म्हणजे ते स्वतः या राज्यातील निवडणुकीत प्रचारात झोकून देतील असे संकेत देण्यात आले आहेत. म्हणजे जिथे काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरते तिथे भाजपचा पराभव होतो हे देखील अनेकदा अधीरेखित झालं आहे. त्यामुळे ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

३ पैकी दोन पराभव झाकण्याचा आटापिटा

वास्तविक देशातील तीन महत्वाच्या निवडणुकीत भाजप दोन निवडणूका हरले म्हणजे येथील असलेली सत्ता गमावली आहे. अगदी हिमाचलमध्ये तर मीच उमेदवार आहे असं समजा आणि मतदान करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर सभेतून केलं होतं. याचा अर्थ लोकांनी भाजपचे उमेदवार नाकारले आणि त्यांनी मोदींना मतदान केलं नाही असाच साधा सरळ अर्थ निघतो. मात्र तो पराभव झाकण्यासाठी केवळ गुजरातवर चर्चा घडविण्यात आली. गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता येणार होती आणि नसती आली तरी मोदी-शहांनी तिथे इतर कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊच दिलं नसतं हे न कळण्याइतके राहुल गांधी राजकीय दृष्ट्या वेडे नाहीत. कारण गुजरातमध्ये सत्ता नसेल तर ते पंतप्रधान पदाच्या चर्चेतून बाहेर जातील आणि ते तसं होऊ देणार नाहीत याची राहुल गांधींना खात्री होती, परिणामी ते भारत जोडो यात्रेमध्ये केंद्रित राहिले आणि प्रियांका गांधींना हिमाचल प्रदेशची जवाबदारी दिली होती. त्याचा परिणामही दिसला आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *