संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्याचं राजकारण चांगलाचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि त्याबाबत राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमची तारीख जशी जवळ येत आहे. त्यापद्धतीने राज्य सरकार तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे येत्या तीन तारखेला राज्यात कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला सतर्केचा इशारा दिला आहे. तर त्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांची देखील बैठक महासंचालक लवकरच घेणार आहे. या बैठकीत भोंगे आणि लाऊडस्पीकर संदर्भात सर्व मार्गदर्शक सुचनाचे कटाक्षाने पालन करण्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गृहमंंत्रालायाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व धर्माच्या लोकांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहिल. त्याच पार्श्वभूमीवर अंमलबजावणीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण चर्चा बैठकीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. फक्त मुस्लिम बांधवांसाठी नव्हे, तर सर्व धार्मियांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावताना परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी येत्या ३ तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. जर मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत. तर त्या पुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जाणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.