संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परिणामी कंपनीला महागड्या दरात बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. देशभरात सध्या वाढत्या महागाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आता पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. कारण वाहनांमध्ये लागणारा सीएनजी व घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाईप नैसर्गिक वायूच्या दरात (पीएनजी) पुन्हा वाढ झाली आहे.
सीएनजीचे दर वाढले
महानगर गॅस लिमिटेडने सोमवारी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात अनुक्रमे ६ रुपये व ४ रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली. याद्वारे दीड महिन्यांपूर्वी झालेली कपात पूर्ववत झाली आहे.
कशामुळे वाढले दर ?
महानगर गॅसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने वायूच्या दरात १ ऑक्टोबरपासून ४० टक्के वाढ केली आहे. त्याचवेळी महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परिणामी कंपनीला महागड्या दराने बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. त्यामुळेच ही दरवाढ करावी लागली आहे. त्यानुसार आता मुंबई शहर व परिसरात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो व पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम असेल.
दरम्यान, जवळपास ३७ रुपयांच्या दरवाढीनंतर महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी वाहनधारकांना ऑगस्ट महिन्यात दिलासा देत दरात ६ रुपये प्रति किलो कपातीची घोषणा करण्यात आली होती. तसंच घरगुती स्वयंपाकासाठीच्या पाईप नैसर्गिक वायू (पीएनजी) दरातदेखील ४ रुपये प्रति एससीएमची कपात करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.