मिरा भाईंदर: मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांनी पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेण्यास बंदी घालण्यात आल्याचे तुघलकी फर्मान काढले आहे ते लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिले आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे, प्रशासकीय पातळीवर चाललेले गैरकारभार, भ्रष्टाचार उघड होत असल्याने केवळ सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर निर्णय घेणाऱ्या आयुक्तांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना वाचवण्यासाठी जे पत्रक प्रशासनातर्फे जारी केले आहे त्यावर कोणाचीही सही नाही.
निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, आचारसंहिता लागू झालेली नाही, नगरसेवकांचा कालावधी या महिन्यात संपणार आहे त्यापूर्वीच आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीसारखा कारभार सुरू केल्याने ही दडपशाही सहन केली जाणार नाही तसेच ही बंदी सत्ताधारी भाजप सह सर्व राजकीय पक्षांना लागू असेल की फक्त काँग्रेससाठी याचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.