Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

एका दिवसात कोरोनामुळे ५० डॉक्टरांचा मृत्यू

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनेही यंदा उच्चांक गाठले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वसामान्यांसोबतच कोरोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या लढवय्या डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं. कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या दिल्लीमधील ‘गुरु तेग बहादूर’ रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टर अनस मुजाहिदला कोरोनामुळेच आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची लागण झाल्यानंतर काही तासांतच त्याचं निधन झालं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या २४४ डॉक्टरांमधील अनस सर्वात तरुण डॉक्टर आहे. पहिल्या लाटेत गेल्यावर्षी ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनसच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र आणि सहकारी डॉक्टर आमीर सोहेलला मोठा धक्का बसला आहे.

अनसला घसा दुखणे अशी काही मध्यम लक्षणं जाणवत होती. रुग्णालयात चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काही वेळातच अनस खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचं लसीकरण झालं नव्हतं. “हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. त्याला कोणतीही व्याधी नव्हती. तसंच आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या नसल्याचं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला असून हे कसं झालं हेच समजत नाहीये,” असं डॉक्टर आमीर सोहेलने म्हटलं आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *