संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘सरस्वती विद्या भवन’ संकुलाच्या हिरक महोत्सव आणि भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘ संमत ‘अर्थात संस्कृत,मराठी व तमिळ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन मुलुंड येथील ‘एनईएस इंटरनॅशनल स्कूल’ (स्वप्ननगरी) याठिकाणी १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात प्राचीन काळातील संत साहित्य, संत कवयित्री, त्यापुढील काळातील संयुक्त महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा, गांधी भगतसिंग यांची विचारसूक्ते, दलित साहित्य, स्त्रीवाद आणि या संदर्भात महाभारत, तमाशा मधील स्त्रियांचे मूल्यमापन, भारतीय संविधान आणि आदिवासींचे विश्वव्यापी अधिकार या विषयांबरोबरच मराठीतील जैन साहित्य, विस्थापितांचे साहित्य, बालसाहित्य, ग्रामीण साहित्य, वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त साहित्य, वंचितांची रंगभूमी या साहित्य प्रवाहांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या बरोबरच तमिळ साहित्यात प्रचलित असणारे साहित्यिक ‘करन कारकी‘, ‘पुथिया माधवी‘ यांचा प्रत्यक्ष परिचय करून घेण्याची संधी तमिळ भाविकांना या संमेलनामुळे प्राप्त होणार आहे अशी माहिती समुहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.वरदराजन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.