Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात सुरक्षेकरिता स्पेशल प्रोटोकॉल नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहन चालकांना मनःस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

याबाबत त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करून कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांना दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपी पेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्रथम प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याने गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत जर अडकून पडली तर रुग्णाच्या जीवाला नाहक धोका होऊ शकतो व तो दगावू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा उगाचंच त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यामागील भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *