संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शंभरहुन अधिक दिवसांची तुरुंगाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्य खासदार संजय राऊत यांच्या वागणुकीत आणि विचारसरणीत कमालीचा बदल जाणवत आहे. तुरुंगातून सुटल्यावर पहिली प्रतिक्रिया देताना काल राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती तसेच केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे विधान केले होते. नव्याने संजय राऊत यांनी भाष्य केले असून यावेळी देखील त्यांचा कल भाजपकडे दिसून आला.
येत्या काळात लोक कल्याणाचा उद्देश ठेवत आपण विविध नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे राऊत म्हणाले, तसेच सध्या महाराष्ट्रात प्रवास करत असलेल्या भारत जोडो यात्रेचे यावेळी त्यांनी तोंडभरून कौतुक देखील केले. भारत जोडो यात्रा देशातील वैर व कटुता संपविण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा एकप्रकारे चळवळ आहे. त्यामुळे भाजपने देखील भारत जोडो यात्रेला पाठिंबा द्यावा, असे विधान संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केले.
एकंदरीतच राऊतांचे हे विधान अनेक जणांच्या भुवया उंचावणारे ठरणार आहे. लवकरच संजय राऊत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे, तत्पूर्वी त्यांनी केलेले हे मोठे विधान या भेटीवर काय परिणाम करणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.