मीरा भाईंदर, प्रतिनिधी : खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत सुरु असलेल्या प्रवेशद्वाराच्या कामाची पाहणी रेल्वे व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, आमदार गीता जैन तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, सुरेश वाकोडे तसेच पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल इंजीनियर राजेश अग्रवाल, इस्टेट विभागाचे सीनियर डिव्हिजनल इंजीनियर सुधीर दुबे, ब्रिज प्रकल्पाचे डिव्हिजनल इंजीनियर अनुप अवस्थी, इलेक्ट्रिकल सीनियर डिव्हिजनल इंजीनियर मोहन पपनोई, चीफ कमर्शिअल इंजिनियर मनोज मिश्रा, आरपीएफ शिंदे त्याचबरोबर एम आर व्ही सी चे जॉईंट एम डी कन्हैया शहा व इतर अधिकारी व उपशहर प्रमुख पप्पू भिसे, छगन चव्हाण व इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर महानगरपालिकेचे सुरु असलेल्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. खासदार विचारे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना व महापालिका अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी २ मिनिटात रेल्वे स्थानकाबाहेर पडली पाहिजे. त्यामुळे स्थानका बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे असावे याची आठवण करून दिली. तसेच या सुरू झालेल्या कामाचे रेल्वे, महानगरपालिका व वाहतूक शाखा यांनी एकत्र बसून रिक्षा स्टॅन्डची जागा निश्चित करून नियोजनबद्ध सुधारित आराखडा तयार करावा मगच काम सुरु करावे. खा. विचारे यांनी स्थानकाबाहेर वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच स्थानकाबाहेरील फेरीवाले रोखण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस स्टेशन च्या मदतीने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या कामासाठी राज्य शासनाचे विशेष अनुदान निधीतून 2 कोटी व महानगरपालिका निधीतून 6 कोटी असे एकूण 8 कोटी खर्च होणार आहे. त्यासाठी रेल्वेने पश्चिम रेल्वे कडून मंजूर झालेले पूर्व व पश्चिमेस सुरु असलेली लिफ्ट व सरकत्या जिन्यांचे काम सुरु करण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. तसेच अतिरिक्त वाढणाऱ्या लिफ्ट व सरकत्या जिन्यांचे काम महापालिकेने रेल्वेमार्फत करून घ्यावे असे निर्देश यावेळी देण्यात आले.