संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिला संयुक्त दिल्ली दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या चर्चेला वेग आलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गृहमंत्रीपदावरून चढाओढ सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
गृह खातं मिळावं यासाठी फडणवीस आग्रही आहेत. तर हे खातं यंदा त्यांच्याऐवजी भाजपच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याकडे देण्यावर केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा भर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांचं नाव राज्य गृहमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याची माहीती सुत्रांकडून दिली जात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीनंतरच मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागेल असे संकेत सत्ताधारी वर्तुळातून दिले जात आहेत. कालच्या बैठकीत सरकारमध्ये प्रामुख्याने नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचं भाजपचे धोरण असल्याची माहीती मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतरच्या प्रस्तावित संघटनात्मक बदलामध्ये प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा नेमला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळचा विस्तार कसा असेल ?
मंत्रिमंडळातील एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाने १० कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याचं बोललं जातं आहे. तर भाजपला २८ मंत्रिपदे देण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. गृहखातं फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला अद्याप भाजपमधून कोणीही दुजोरा दिलेला नाही.