संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. अंधेरी पोटनिवडणुकीतील हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जनसेवा आणि विकास कामेच केली आहेत. त्याची पोचपावती म्हणजेच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील माझा विजय आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी विजयानंतर दिली.
उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांनी नोटाला मत देण्यासाठी प्रचार केला होता. त्याचे व्हिडीओही समोर आले होते. पण मतदारांनी या सर्व गोष्टी नाकारून शिवसेनेला मतदान केले. ज्या नोटांना मतदान झाले आहे ते भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांनी माघार घेतली कारण त्यांना वाटले की, ” एवढी मते मिळाली असती, सहानुभूती असती तर त्यांनी आधी उमेदवार दिला नसता.” अशी टीका लटके यांनी केली.
रमेश लटके यांनी जे काही काम हाती घेतले ते पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय आहे. उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या पाठिंब्यामुळे मी विजयी झाली आहे. आता मातोश्रीवर जाणार असल्याचेही लटके म्हणाले.
‘हा विजय पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे, त्यांचे मी आभार मानते. हा जल्लोष मी साजरा करणार नाही. माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मी माझ्या पतीच्या जागेवर ही निवडणूक लढवली असून हा माझ्या पतीचा विजय आहे. अंधेरीचा विकास व्हावा, हा त्यांचा विचार होता. आम्हाला नवं पक्षचिन्ह मिळालं, त्या चिन्हाखाली हा विजय आहे. पण मला एक गोष्टीची खंत आहे. पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागली’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.