संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राजकीय घडामोडींनी भलताच वेग घेतला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत जाऊन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्याचप्रमाणे आता शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करण्यासाठी मनसेचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज पुन्हा भेट होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, आता प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगासाठी हे तिघे एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क वरील दीपोत्सवानंतर तिन्ही नेते आज पुन्हा भेटणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी अधिकच वाढत आहेत. कधी एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कमधील दीपोत्सवासाठी, तर कधी एखाद्या उद्योजकाच्या सामाजिक प्रकल्पासाठी एकत्र येत असल्याचे दिसत आहे.
इतकंच नाही तर महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कार्यक्रमाच्या मुहूर्तावरही दोघे एकाच मंचावर दिसले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे अनेकवेळा एकत्र आलेत. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील सततच्या बैठका ही भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना ? अशी चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.