मनोहर भिडेला अटक करण्याची केली मागणी !
भाईंदर, प्रतिनिधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्द्ल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मीरा भाईंदर काँग्रेस तर्फे गोडदेव नाका येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, महिला, युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर भिडे नावाची व्यक्ती विविध प्रकारे आक्षेपार्ह विधाने करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांना देशाचे स्वातंत्र्य मान्य नाही, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, महापुरुषांचा त्याग, बलिदान मान्य नाही, जो व्यक्ती कोट्यावधी लोकांची श्रद्धा असलेले साईबाबांच्या संदर्भात गरळ ओकतो, देशाचे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतो.
महिला पत्रकाराचा अपमान, माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुले होतात अशी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू भिडेंला अटक का केली जात नाही? असा सवाल आंदोलन दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, अनिल सावंत, प्रकाश नागणे, राकेश राजपुरोहित, सुरेश मिश्रा, सिद्धेश राणे, हेमांगी पाटील, सुशन शेट्टी आदी वक्त्यांनी करीत भिडेंला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर नवघर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.