संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सिडनी येथे सुरू असलेल्या जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्लूआयसीएफ) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा २९ धावांनी पराभव करून विजयी प्रारंभ करून दिला. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ९९ धावा केल्या तर इंग्लंडला ७० धावाच करता आल्या.
भारताच्या १६ षटकांच्या सामन्यात पहिल्या ४ षटकात पहिल्या जोडीला फक्त ६ धावाच करता आल्या (बाद झाल्यावर प्रत्येक वेळी ५ रन वजा होतात). मात्र नंतरच्या तीन जोड्यांनी अनुक्रमे ३०, २९ व ३४ धावांची भर घातल्याने भारताला ९९ धावांचा पल्ला गाठता आला. तर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या चार जोड्यांना अनुक्रमे १९, १५, १६ व २० धावांवर रोखल्याने भारताला मोठा विजय साजरा करता आला. इंग्लंड फलंदाजीच्या वेळी दुसर्या व तिसर्या चार-चार षटकात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना १५ व १६ धावांवर रोखले हाच भारतीय विजयाचा टर्निंग पॉइंट ठरला. या षटकांदरम्यान भारतीय क्षेत्ररक्षण कमालीचे चपळ व दक्ष वाटले.
भारता तर्फे दैविक राय (१) व यतीश चन्नाप्पा (५) हि सलामीची जोडी खेळायला उतरली पण या जोडीला काही विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१०) व अफ्रोज पाशा (२०) तिसऱ्या जोडीतील गिरीश गोपाल (९) व नमशीद व्हि. (२०) आणि शेवटच्या जोडीतील अरिज अजीज (१६) व सुरज रेड्डी (१८) यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने मोठा विजय संपादन केला.
इंग्लंडच्या पहिल्या जोडीमधील जायडेन शाॅर्ट (९) व माइक गॅलर (१०) दुसऱ्या जोडीमधील नातं रिमिंगटोन (६), टॉम क्लार्क (९), तिसऱ्या जोडीतील मॅट गेलर (२०) लिम ब्रेजर (-४) तर शेवटच्या जोडीतील नव पटेल (१७) व ऑलिवर ग्रीन (३) यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही.
भारताच्या सुरज रेड्डीने तीन फलंदाज बाद केले, तर अफरोज पाशा, गिरीश गोपाल व दैविक राय यांनी प्रत्येकी दोन-दोन फलंदाजांना बाद केले. या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून भारताच्या सुरज रेड्डी ला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.