![](http://www.lokhitnews.in/wp-content/uploads/2021/07/img-20210731-wa00346988513861649255127.jpg)
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
पूरग्रस्तांच्या नावाखाली कोणतीही आपत्ती कोसळली की, ज्याप्रमाणे दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येऊन सढळ हस्ते मदत करतात, त्याचप्रमाणे काही भामटे, समाजकंटक या परिस्थितीचाही पुरेपूर गैरफायदा घेतात. राज्यात आलेल्या महापुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून त्यांना मदत करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना फसविले जात आहे. विविध संस्थांच्या नावे समाजमाध्यमांवर जाहिराती करून मदत वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात स्वीकारली जात असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुरामध्ये झालेली जीवितहानी आणि वित्तहानी याबाबतचे फोटो आणि त्यासोबत सामाजिक संस्थांच्या नावाचा गैरवापर करून वस्तू आणि पैसे स्वीकारले जात आहेत. काही संस्थांच्या नावाचे प्रोफाइल तयार करून ती संस्था आपणच चालवीत असल्याचे भासविले जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये पैसे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी संस्थांच्या ऐवजी वैयक्तिक खात्याचा तपशील दिला जात असल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनी केलेले आवाहन :-
१) समाजमाध्यमांवर, इंटनेटरवरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
२) कुणाच्याही प्रोफाइलवर, लिंक वर क्लिक करू नका.
३) मदत करण्यापूर्वी संस्था अधिकृत असल्याची खात्री करा.
४) शहानिशा केल्या शिवाय समाजमाध्यमांवर मदतीचे संदेश व्हायरल करू नका.
५) ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना बँक खाते, डेबिट कार्डचा तपशील देऊ नका.
६) फसवणूक झाल्यास किंवा शंका आल्यास स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे किंवा येथे www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा असे सायबर सेल तर्फे आव्हान करण्यात आले आहे.