संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
बुलढाणा येथील मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसीमध्ये २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘बेंजो केम कंपनी’च्या दूषित पाण्यामुळे शेतजमिनीसह पाणी स्रोतांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही.
कंपनीतून वाहणारे विषारी पाणी वाघोळा, म्हैसवाडी, रणथम, दसरखेड या परिसरातील विहिरींमध्येही मिसळत होते. त्यामुळे दसरखेड येथील अरविंद महाजन, निना धारकर, गोविंदराव डोसे, विनोद एकडे, उमेश नारखेडे आणि इतर ४५ शेतकऱ्यांनी पुणे येथील हरित लवाद न्यायालयात प्रकरण ऍड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत दाखल केले होते.
याचिकाकर्त्याची बाजू ऍड. बिना परदेशी यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत २९ ऑगस्ट रोजी निर्णय दिला. मलकापूर येथील ‘बेंजो केम कंपनी’ने गत दहा वर्षांपासून रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने तसेच दूषित पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने ५० शेतकऱ्यांची २५० एकर जमीन नापीक झाली.
याप्रकरणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या प्रकरणात ‘बेंजो केम कंपनी’च्या परवान्यातील अटी व शर्ती, तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला २५० कोटी रुपये दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिला आहे. तसेच हा दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.