संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी सेवाभावी संस्था व संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
सोमवारच्या आढावा बैठकीत महापालिकेकडे असलेल्या आरक्षित भूखंडांची माहिती त्यांनी घेतली आणि सदर भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब करणेबाबत सुचना अधिकारी वर्गाला देतांना त्यांनी हे आवाहन केले.
महापालिकेने ताब्यात घेतलेले सुमारे ३४३ आरक्षित भूंखंड आहेत, महापालिकेच्या या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून भूखंडाच्या सभोवताली वृक्षारोपण करावे त्यासाठी इच्छुक अशासकीय सेवाभावी संस्था व संघटनांची मदत घ्यावी, किंवा आरक्षित भूखंडाचा विकास होईपर्यंत आरक्षित भूखंड मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन द्यावेत आणि उत्तम खेडाळू घडविण्यासाठी या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांनी पुढे यावे व अधिक माहितीसाठी महापालिकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ताब्यातील आरक्षित भूखंडांभोवती वाडेभिंती किंवा तारेचे कुंपण घालून त्या संरक्षित कराव्यात, असे निर्देशही त्यांनी संबंधीत सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले.
रस्ते स्वच्छ केले जात नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी रस्ते सफाईकडे स्वत: लक्ष पुरवावेत. त्याचप्रमाणे रस्ते साफ सफाईसाठी मायक्रो प्लॅनिंग करावे, Garbage Vulrenable Points शोधुन तेथे नियमित साफ सफाई करावी, स्वच्छता ही व्यवस्थित झालीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले.
पावसाळयातील दुर्घटना टाळण्यासाठी रहिवासीमुक्त इमारती त्वरीत निष्कासित कराव्यात आणि सदर इमारती निष्कासित करण्यापूर्वी रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देणेबाबतचे आदेशही त्यांनी प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्याची कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.