संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात चारचाकी वाहनांमधील सहप्रवाशांना आता सीटबेल्ट लावणे सक्तीचं होणार आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांवर मुंबई वाहतूक पोलीस १ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करतील. ज्या वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,असं वाहतूक पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सादर केलेल्या अलिकडच्या अहवालानुसार सीट बेल्ट न लावल्यामुळे २०२० मध्ये देशभरात झालेल्या अनेक वाहन अपघातांमध्ये १५ हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या लोकांनी सीट बेल्ट लावला असता तर त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळे मोटार वाहन चालक व सह प्रवासी यांना सिटबेल्ट लावणे बंधनकारक होणार आहे. मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) मध्ये चारचाकी मोटार वाहनातील वाहन चालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास ते दंडास पात्र ठरणार आहे.
ज्या चारचाकी वाहनांमध्ये सर्व सहप्रवास्यांना सिटबेल्ट करिता सुविधा नसेल त्यांना १ नोव्हेंबर २०२२ पर्यत सीटबेल्ट बाबत आवश्यक ती सुधारणा करण्याकरिता अवधी देण्यात येत आहे. त्यानंतर मुंबई शहरातील रस्त्यावरून चारचाकी मोटार वाहनाने प्रवास करणाऱ्या चालक व इतर प्रवासी यांनी सिटबेल्ट लावणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचेवर १ नोव्हेंबरपासून मोटार वाहन कायद्या नुसार कारवाई करण्यात येईल असे वाहतूक पोलीसांनी म्हटले आहे.
गेल्या महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन झालं. तेव्हापासून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील वाहतूक पोलीसांनी रहदारीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन प्रवासासाठी नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सीट चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणं बंधनकारक केलं आहे. आता असाच नियम मुंबईत देखील लागू करण्यात आला आहे.