![](http://www.lokhitnews.in/wp-content/uploads/2021/07/img-20210718-wa00258327481789744379372-1024x574.jpg)
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आजोबांचे प्राण थोडक्याय वाचले. कल्याण रेल्वे स्टेशनवर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
मुंबईहुन वाराणसीला जाणारी महानगरी एक्स्प्रेस कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वरून सुटली. आणि त्याचवेळी काही अंतरावर पुढे एक वयोवृद्ध आजोबा रेल्वेरूळावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने उभे होते. गाडीनेही अवघ्या सेकंदात वेग धरला होता. रुळांवर असणाऱ्या आजोबांना पाहून एक्स्प्रेसचे मोटरमन एस.के.प्रधान यांनी वारंवार हॉर्नही वाजवला. मात्र गाडी पुढे येईपर्यंत आजोबा अजिबात जागचे हलले नाहीत. मात्र मोटरमन एस.के.प्रधान आणि सहाय्यक मोटरमन रवी शंकर यांनी आपले सर्व कसब आणि अनुभव पणाला लावून एक्स्प्रेसचे अर्जंट ब्रेक दाबले. तोपर्यंत एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा भाग आजोबांच्या अंगावरून गेला होता. मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत इंजिनखाली पाहिले असता हे आजोबा सुखरूप असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी अत्यंत हळुवारपणे आजोबांना इंजिनाच्या पुढील भागातून बाहेर काढले आणि तातडीने रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले. एक्स्प्रेसचे मोटरमन एस.के.प्रधान आणि रवी शंकर यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे त्यांचे कौतूक होत आहे.