![](http://www.lokhitnews.in/wp-content/uploads/2021/07/img-20210702-wa00065621447997134626535-882x1024.jpg)
संपादक: मोईन सय्यद/ मीरा भाईंदर, प्रतिनिधी
मिरारोड- मीरा भाईंदर शहरात महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर आठवड्यातून ४ दिवस लसच मिळत नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने लशींचा साठा वाढवून घेण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.
कॉवाक्सिन २८ दिवसांनी तर कोव्हीशिल्ड ८४ दिवसांनी घेण्याची नियोजित तारीख उलटून गेली तरी ज्येष्ठ नागरिक,महिला आदींसह सर्वच घटकांना दुसरा लशींचा डोस मिळत नाही. या केंद्रावरून त्या केंद्रावर जाण्याची धावपळ करीत आहेत, त्यात पहिला डोस घेण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत असे नागणे यांनी सांगितले. दररोज प्रशासन परिपत्रक काढून ‘त्या’ विशिष्ट गटातीलच लोकांचे लसीकरण केले जाणार असल्याचा फतवा काढते, त्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंदच झाले आहे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी सामाजिक बांधिलकी समजून नागरिकांना मदत करीत आहेत, लशींचा साठा कमी येत असल्याने तीन चार दिवसांनी सुरू झालेल्या केंद्रांवर झुंबड उडते.
आजमितीला २,३८,८०६ जणांनी पहिला तर फक्त ७६,७३७ जणांनी दोन्ही घेतले आहेत. लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण कमी आहे, लशींचा साठा वाढवून केंद्रे उघडली तर योग्य आहे परंतु लसी कमी येत असताना भरमसाठ केंद्र उघडून एकाही केंद्रावर योग्य प्रकारे सेवा सुविधा मिळत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे, तर दुसरीकडे खाजगी सोसायट्यांमध्ये आठ- नऊशे रुपये मोजून लसींचे डोस घेतले जात असून ही लूटमार थांबविण्यासाठी त्याचा दरही वाजवी असावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.